पोलिस व महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार?   

अवजड वाहनांमुळे अपघातात वाढ, उपाययोजना करण्याची काळाची गरज 

पुणे : शहरातील अति उतार भाग असलेल्या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. शहरात अवजड वाहनांना बंदी असूनही जड वाहनांची वाहतूक बिनधास्तपणे रस्त्यावर सुरूच आहे. त्यामुळे रस्ते अपघातात अधिक भर पडत असून निष्पाप लोकांचा बळी जात आहे. याकडे मात्र, वाहतूक पोलिस व महापालिका प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच, कुठल्याही उपाययोजना करण्यास दोन्ही प्रशासन अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रशासनाला जाग कधी येणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. 
 
मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकात बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास भरधाव मालमोटारीने पुढे जाणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या दीपाली सोनी या महिलेचा चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर महिलेचे सासरे गंभीर जखमी झाले. यावेळी संतप्त नागरिकांनी वाहतूक पोलिस व महापालिका प्रशासनावर राग व्यक्त केला.  दोन्ही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप महिलेचा बळी गेला आहे, असा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनांच्या सुरक्षाव्यवस्थेवरच पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  
 
उपाययोजनाची मागणी 
 
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या चौकातील वाहतूक व्यवस्थेचा वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाला समन्वयाने फेरविचार करावा लागेल. याशिवाय शहरातील सर्व धोकादायक चौक आणि वर्दळीच्या रस्त्यांवर प्रशासन आणि पोलिसांनी गांभीर्याने ताडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 
 
अवजड बंदीचा आदेश कागदावरच 
 
गंगाधाम-मार्केटयार्ड रस्त्यांवर अवजड वाहनांना वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे. परंतु वाहतूक पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. या रस्त्यावर सूचना फलकही नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहतूक अत्यंत धोकादायक झाली आहे. अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी भरधाव मालमोटारीने एका महिलेला चिरडले होते. तर किरकोळ स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे अवजड वाहन बंदीचा आदेश केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते. 
 
धोकादायक वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर 
 
या भागामध्ये मोठया प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. येथील रस्त्यावर दिवसा अवजड वाहने येण्यास बंदी असूनही वाहने सर्रासपणे येतात. त्याकडे वाहतूक पोलिसांकडून कायम दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, महापालिका व पोलिस प्रशासनाकडून अवजड वाहनांवरील बंदीची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे धोकादायक वाहतूकीचा प्रश्न निर्माण होत आहे. मिक्सर, खडी, क्रशसँड, सिमेंट व स्टीलचे मालमोटार, डंपर येत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागत आहे. 
 
पोलिस आयुक्तांचा इशारा ’धुळफेक’
 
अवजड वाहनांमुळे शहरात झालेल्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर डंपर, मालमोटार, सिमेंट मिक्सर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत गंभीर स्वरुपाच्या अपघातास असलेल्या अवजड वाहनांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. 
 
शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी असणार्‍या रस्त्यांवर प्रवेश करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी अनेक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. वाहनचालकांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन करू नये. शिस्त पाळावी. 
 
अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त (वाहतूक विभाग)
 
पाच महिन्यात १३३ जणांचा मृत्यू
 
गेल्या वर्षी शहरात ३३४ प्राणांतिक अपघात झाले आहेत. या अपघातात   ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी २०२५ ते मे अखेरीस म्हणजे गेल्या पाच महिन्यांत शहरातील वेगवेगळ्या भागांत झालेल्या अपघातांत १३३ जणांचा बळी गेला आहे. या निष्पाप लोकांच्या बळीला जबाबदार कोण? असा संतप्त सवालही नागरिक करीत आहेत. अशा अपघाताला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपायोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Related Articles